Chandrapur dist@ news
• मराठा सेवा संघाच्या वतीने सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमाचे आयोजन!
अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर – गत २५ वर्षांपासून मराठा सेवा संघ चंद्रपूर जिल्ह्यात विविध स्तरावर सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यामुळे संघटनेचा जिल्हाभर विस्तार झालेला असून संघटना गांव-खेड्यापर्यंत पोहचली आहे. संघटनेशी जुळलेले कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या कार्याची दखल घेऊन संघटना आपले सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडत असते.
११ मे २०२४ ला’ मराठा सेवा संघ भवन ‘ आक्केवार वाडी तुकूम येथे सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ३० एप्रिलला शासकीय सेवेतून निवृत्त झालेले जिल्हा परिषद चंद्रपूरचे लेखाधिकारी दिपक जेऊरकर यांनी आपली शासकीय सेवा सांभाळून जिल्ह्यात मराठा सेवा संघ रुजविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेचे मानद सचिव, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तमरित्या कार्य केले आहे. गडचांदूर चे माजी तालुका अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र थिपे, जवाहर कनिष्ठ महाविद्यालय, आवाळपूर येथून सेवानिवृत्त झाले असून मराठा सेवा संघाचे ते मार्गदर्शक आहेत.
कवी मनाचे जयंत झंझाड यांचा नुकताच ‘ पळसाला पाने चारच ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. नागपूर WCL विभागीय कार्यालयातून ते निवृत्त झाले तद्वतच ते या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. या शिवाय विलास कोळसे हे अनेक वर्षांपासून संघटनेचे एक हितचिंतक आहेत. स्वत:चा डेकोरेशनचा व्यवसाय असून ते उर्जानगर पॉवर स्टेशन येथून निवृत्त झाले आहे.
या सर्व सत्कारमुर्तींचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, ग्रंथ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वच सत्कारमुर्तींनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याचे कौतुक करून यापुढेही कार्यात सातत्य राखण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी विचारपिठावर जिल्हाध्यक्ष इंजी. दिपक खामनकर, जि. प. चंद्रपूरचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम जिल्हा सचिव प्रितमा परकारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजी. दिपक खामनकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य पुढे नेण्याचे आश्वासन दिले. डॉ .प्रा. दिलिप चौधरी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि हेतू स्पष्ट केले. प्रशांत गोखरे यांनी सूत्रसंचालन, तर आभार कामेश कुरेकार यांनी मानले. शुभांगी आसुटकर, इंदू काळे, अतूल किनेकर, आणि चेतन बोबडे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाला गडचांदूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, उर्जानगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.