chandrapur @city news
•कर्नाटका एम्टा कंपनी मधील सुरु असलेला कोळसा चोरीचा प्रकार त्वरित थांबवा : आ. किशोर जोरगेवार.
•खनिकर्म मंत्र्यांनी दिले चौकशी करण्याचे आश्वासन.
सुवर्ण भारत: किरण घाटे ( सहसंपादक)
चंद्रपूर:चंद्रपूरात कोळसा चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कर्नाटका एम्टा कंपनी मध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असुन येथुन निघणारा कोळशाचा ट्रक कर्नाटकाला न जाता खुल्या बाजारपेठेत विकला जात आहे. त्यामुळे शासनाचा महसुल बुडत असुन गुन्हेगारी वाढत आहे. सदरहु कोळसा चोरीचा प्रकार तात्काळ थांबवत जोपर्यंत येथील कोळसा सुरक्षित होत नाही तो पर्यंत येथील कोळसा उत्खनन बंद करावे. अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधीवर बोलतांना अधिवेशनात केली आहे. उपरोक्त प्रकारा बाबत चौकशी करण्याचे आश्वासन खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीवर बोलतांना आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या कोळसा चोरीच्या प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी येथील पुनर्वसनाचा विषयही खनिकर्म मंत्र्यांच्या लक्षात आणून दिला. लक्षवेधीवर बोलतांना ते म्हणाले की, २००८ मध्ये कर्नाटक एम्टा ही कोळसा खाण घोषीत झाली. त्यानंतर येथील जमीनींचे अधिग्रहण सुरु करण्यात आले. मात्र अद्यापही येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यांनतर १५ डिसेंबर २०१६ मध्ये प्रकल्पबाधितांसाठी आर एँन्ड आर पॅकेज ठरविण्यात आले. परंतु याचीही पूर्तता झालेली नाही. जमीन अधिग्रहीत करतांना भूधारकांना केवळ ५० टक्के रक्कम देण्यात आली. आणि उत्खनन पुर्ण झाल्या नंतर शेतक-यांना सात – सात वर्षांकरिता जमीन परत केल्या जाणार होती. मात्र १४ वर्षे उलटूनही आजपर्यंत एक इंचही जागा शेतक-यांना परत करण्यात आलेली नाही. त्यामूळे उर्वरीत पैसे परत देत जमीन कधी परत करणार आहात असा सवाल यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला.
उद्योग सुरु करतांना ८५० लोकांना रोजगार देऊ असे कंपनीच्या वतीने लिखीत स्वरुपात देण्यात आले आहे. नौकरी देणे शक्य न झाल्यास ५ लाख रुपये अतिरिक्त देण्याचे कंपनीने करारात म्हटले आहे. पंरतु येथे केवळ १८९ लोकांनाच नौकरी देण्यात आली असुन उर्वरित प्रकल्पग्रस्त लोकांना ५ लाख रुपये देण्यात आलेले नाही याकडेही आमदार जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
कर्नाटक एन्टा ही कर्नाटक सरकारच्या ऊर्जा विभागाला देण्यात आलेली कंपनी आहे. परंतु त्यांनी बरांज मायनिंग खान नावाची परस्पर कंपनी सुरु करुन उत्खनन सुरु केले आहे. या कंपनीच्या अनेक तक्रारी आहे. येथे कोळसा चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे या प्रकारावर तात्काळ अंकुश लावण्यात यावे, येथे साठवूण ठेवण्यात आलेल्या कोळश्याला आग लागली असे दर्शविल्या गेले. मात्र गुगल मॅपवर पाहिले असता येथे कोणतीही आग लागली नाही हे निष्पन्न झाले आहे. येथे कोळश्याची लुट सुरु आहे. याकडेही सभागृहाचे आ. जोरगेवार यांनी लक्ष वेधले. वन विभाागाची ८४ हेक्टर जमीन सदर कंपनीला देण्यात आली आहे. त्या ठिकाणी १२६९ घरांचे पुनर्वसन करणे आहे. काही घराचे पुनर्वसन झाले आहे. मात्र तोवर पूर्ण घरांचे पुनर्वसन होत नाही. तो पर्यंत्न येथे उत्खनन सुरु करु नये अशी येथे अट आहे. त्यामुळे जोवर पुर्ण घरांचे पुनर्वसन होत नाही. तो पर्यंत येथील उत्खनन थांबविण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी खनिकर्म मंत्री यांना केली. यावर उत्तर देतांना खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी २०१६ मध्ये प्रकल्पबाधितांसाठी ठरविण्यात आलेले आर एँन्ड आर पॅकेज त्यांना दिला जाईल. तसेच सर्व प्रकाराची चौकशी करुन योग्य कार्यवाही करण्यात येणार असे म्हटले आहे.