अकोला : अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी गरीब स्वयंपाक माणसाच्या कानाखाली लावली हा प्रकार म्हणजे ‘दादागिरी’ असल्याचा आरोप होत असून त्याचे हात व्यवस्थेच्या कानाखाली का लगावत नाहीत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे. सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकी नंतर जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याने मेसमध्ये जात त्याची तपासणी केली. याच मेसमध्ये असलेल्या सुनिल मोरे ह्या कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानाखाली मारले. ही बाब संतापजनक असून आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पातळी सोडून दादागिरीचा पुरावा आहे. स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे असते.गोरगरीब माणसाला मारून व्यवस्था बदलत नाही तर व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस पालकमंत्र्यानी दाखवावे असे आव्हान वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केले आहे.
पालकमंत्री म्हणून सुपरस्पेशालिटी सुरू करण्यासाठी दादागिरी करणे अपेक्षित आहे. मात्र पालकमंत्री दादागिरी करताहेत ती सामान्य माणसावर. हे कँटीन साहेबराव कुलमेथे, वरिष्ठ लिपिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्यांचे अखत्यारीत आहे. त्यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न मेसचे प्रमुख कुळमेथे यांना विचारल्यावर त्यांनी २३ किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्न नंतर पालकमंत्र्यांनी जेवण बनवणारे स्वयंपाकी सुनिल मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. मग चूक कुणाची होती ? व्यवस्थपका पेक्षा जास्त डाळ लागत असल्याचे स्वयंपाक्याने सांगितले नव्हते, अश्या वेळी गरीब स्वयंपाक्याला मारणे ही गुंडांगरी कशा साठी आहे, ह्याचे उत्तर पालकमंत्री देतील का ? असा सवालही वंचित युवा आघाडीने केला आहे.
मेडीकल कॉलेजमध्ये खोकल्यासह अनेक औषधांचा तुटवडा आहे, मनुष्यबळ तुटवडा आहे, मल्टिविटामिन औषध उपलब्ध नाहीत, कोविड साठी मान्यता दिलेल्या हॉटेल आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये अवाच्यासव्या दर आकारणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांचे सोबत एमओयू केले असेल तर तो सार्वजनिक का केला जात नाही ? लसीकरण करण्यासाठी उपलब्ध लसीचा साठा दोन दिवसांत संपणार आहे, ऑक्सीजन प्लांट का सुरू होत नाहीये, त्यावर मारामारी कधी करणार आहात ? ह्याचा खुलासा पालकमंत्री कधी करणार आहेत ? असे सवाल राजेंद्र पातोडे यांनी केले आहेत.