Chandrapur@ city news
■ आम आदमी पार्टीचा येत्या हिवाळी अधिवेशनात भव्य जनमोर्चा !
■ जनतेच्या महत्वांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावे- आपची मागणी
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपुर: यंदा राज्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.शासनाने काही प्रमाणात मदत जाहीर केली परंतु ती फार अल्पशी आहे. दुसरीकडे विमा कंपन्या शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाहीत, बरेच चुकीचे किंवा क्लिष्ट नॉर्म असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर सुद्धा मदत मिळत नाही, उलट शेतकऱ्यांकडून विमा रक्कमेपोटी हजारों रुपये भरून सुद्धा झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळत नाही, विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात ही वास्तविकता सर्वश्रूतच आहे.
राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा फारच खालावला आहे, त्यामुळे शाळांमधील पट संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, यावर सुधारणा करायला पाहिजे परंतु आपले सरकार कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे राज्यातील बिना अनुदानित शाळा भरमसाठ शुल्क आकारणी करतात आणि RTE च्या नियमांचे पालन करीत नाहीत.
राज्यातील अनेक सरकारी कार्यालयात पदे रिक्त आहेत, गेल्या अनेक वर्षांत पद भरती झालेली नाही, त्यामुळे सरकारी कार्यालयात नागरिकांचे कामे वेळेवर होत नाहीत. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून अंश कालीन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेले नाही.ही वस्तुस्थिती आहे.
एकंदरीत राज्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, पालक, सुशिक्षीत तरुण यांना जीवन जगणे सुसह्य व्हावे म्हणून आम आदमी पार्टीच्या प्रसिद्धी साठी दिलेल्या पत्रकात खालील मागण्या नमूद करण्यात आल्या आहे. त्या या प्रमाणे
१)संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई प्रती हेक्टरी ५० हजार देण्यात यावी. पिक विमा कंपनीला सरसकट पिक विमा देणे अनिवार्य करावे.
२)शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देण्यात यावे.
३)शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा, थकीत वीज बिल व शेती कर्ज माफ करावे.
४) सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत, अंश कालीन कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करण्यात यावे.
५)सरकारी शाळा दिल्लीच्या धर्तीवर दर्जेदार कराव्यात, कमी पट संख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही याची हमी द्यावी.
६)खाजगी शाळा प्रशासनाकडून पालकांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी शुल्कावर नियंत्रण आणावे व शिक्षण अधिकार कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात यावी.
७)पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा.
८)अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आदिवासी व बिगर आदिवासींना वन जमिनीचे पट्टे देण्याचा प्रश्न निकाली काढून वाहितदारांना पट्टे देण्यात यावे.
९)वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल करावा.
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडून या मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आप सातत्याने प्रयत्न करीत आहेत, मात्र अद्यापही या मागण्यांवर विचार झाला नाही .
या मागण्यांची परिपुर्तता कराल अशी अपेक्षा आप पार्टीने शासनाकडून केली आहे. अधिवेशना पूर्वी याबाबत तोडगा काढून महाराष्ट्र राज्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी दिलेल्या पत्रकातून केली आहे. उपरोक्त मागण्या अधिवेशनापूर्वी मान्य झाल्या नाहीत तर येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आम आदमी पार्टी या मागण्यांना घेऊन राज्यव्यापी जन मोर्चा काढणार असल्याचे एक निवेदन आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चंद्रपूर जिल्हाधिकां-या मार्फत सादर करण्यात आले .या वेळी जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी,युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार,युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, योगेश मुरेकार,उपाध्यक्ष सिकंदर सागोरे,पवन प्रसाद,झोन कोषाध्यक्ष नागसेन लाभाने,ईश्वर सहारे,दिपक बेरशेट्टीवार,योगेश गोखरे,सुधिर पाटील,जितेन्द्र कुमार भाटिया आदीं उपस्थित होते.
