Chandrapur @dist news
• चंद्रपूर जिल्ह्यातील संपकरी म्हणतात- आता आश्वासनाची खैरात नको मागण्यांची पूर्तता हवी !
• येत्या २१तारखेला चंद्रपूरात निघतोय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा !
•कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका कायम !
सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)
चंद्रपुर: १४मार्च पासून आपल्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यातील अंदाजे सतरा लाख कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपला बेमुदत संप पुकारला असून या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील अंदाजे २० हजार राज्य शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत.
संपाचा आजचा पाचवा दिवस असून चंद्रपूर जिल्ह्यातून या संपास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान सुरु असलेल्या या संपाला जिल्ह्यातील आम आदमी पार्टीने व काही सामाजिक संघटनेंनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.सध्या राज्य सरकारी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून “आता आश्वासनाची खैरात नको तर आम्हाला जुनीच पेंशन हवी आहे “असे म्हणतांना दिसू लागले आहे याच प्रमुख मागणीसाठी व शासनदरबारी खितपत पडलेल्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून हजारों कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संप पुकारला आहे.
दरम्यान या संपामूळे जिल्ह्याभरातील अनेक शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प पडल्याचे एकंदरीत दृष्टीक्षेपात पडत आहे. या संपामुळे सर्वसामान्य जनतेचे व शेतकरी वर्गांचे हाल होत आहेत.हे मात्र तेव्हढेच खरे आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर येत्या २१मार्चला चंद्रपूर शहरातील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून संपात सहभागी झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विराट मूक मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने सकाळी ११वाजता निघत असून जिल्ह्यातील संपकरी मोठ्या संख्येंने या मोर्चात सहभागी होत आहे.
जिल्हा प्रशासनाने या मूक मोर्चाला परवानगी दिली असल्याची माहिती आज शनिवारी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी या प्रतिनिधीस दिली.सुरु असलेला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा संप हा चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा दिपक जेऊरकर व राजू धांडे यांनी केला आहे. विविध संघटनांचे जेष्ठ पदाधिकारी नित्य संपकर्त्यांना संप मंडपात मोलाचे मार्गदर्शन करताना दिसून येत आहे. मागणी पूर्ण होईं पर्यंत मागे हटायचे नाही असा संकल्प संपकर्त्यांनी एकंदरीत केला आहे .