
• खिशातील आधार कार्डने उलगडली ओळख; चिमूरच्या बालाजी सागर तलावात युवकाचा मृतदेह आढळला
• दोन दिवसांपासून होता बेपत्ता; उरकुडपार येथील तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ
सुवर्ण भारत: सुनील हिंगणकर
चिमूर : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३६ वर्षीय युवकाचा मृतदेह आज, सोमवारी सकाळी चिमूर येथील ऐतिहासिक बालाजी सागर तलावात तरंगताना आढळून आला. मृताच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डमुळे त्याची ओळख पटली असून, राकेश पत्रु डांगे (वय ३६, रा. उरकुडपार) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश डांगे हा शनिवारपासून घरातून बेपत्ता होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने अखेर रविवार, २९ मार्च रोजी चिमूर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आज ३० मार्च रोजी सकाळी तलाव परिसरात काम करणाऱ्या मजुरांना पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी घटनेची माहिती तातडीने चिमूर पोलिसांना दिली.
आधार कार्ड ठरले ओळख पटविण्यास उपयुक्त
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला व पंचनामा केला. मृतदेहाची झडती घेतली असता, त्याच्या खिशात आधार कार्ड आढळून आले. त्यावरून सदर मृतदेह उरकुडपार येथील राकेश डांगे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
राकेशच्या निधनामुळे उरकुडपार गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा आप्तलपरिवार आहे. कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
> पोलीस तपास सुरू
> या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस करीत आहेत. हा घातपात आहे की आत्महत्या, याचा शोध पोलीस घेत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
>




