Chandrapur city@ news
•चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयातील परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणा बाबत तातडीने चौकशी करा- वंचित बहुजन आघाडीचे रुग्णालयातच आंदोलन!
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील ग्रामीण भागातील अनेक गरीब व गरजू रुग्ण कमी खर्चात उपचार व्हावे यासाठी शासकीय व ग्रामीण रुग्णालय येथे भरती होत असतात.मात्र येथील रुग्णालयात योग्य उपचार सुविधा मिळत नसल्याचे एकंदरीत दृष्टीक्षेपात पडत आहे. या बाबतीत अनेकदा वंचित बहुजन आघाडीने रुग्णांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन केले होते.स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका सीमा मेश्राम यांना काल आपला प्राण गमवावा लागला.
शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही हे आता या प्रकरणावरुन उघड झाले आहे. त्याच रुग्णालयात आपले निष्ठेने व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या एका नर्सला उपचारा अभावी जीव गमवावा लागला ही दुर्दैवी घटना असून निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भोंगळ कारभाराचा हा रुग्णालयातील एक पुरावा असल्याचा आरोप देखिल त्यांनी केला आहे.इतरांची काळजी घेण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका परिचारिकेला जीव गमवावा लागला ही एक दुर्दैवाची बाब असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही, सरकारच्या अनेक योजना सपशेल फेल झाल्या आहे.वैद्यकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहे.
रुग्णांची दुर्दशा ही चिंतेची बाब असून, रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते ? तंज्ञ डॉक्टर कुठे गेले होते ? रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची का तपासणी झाली नाही ? आदिं प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उपस्थित करुन या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करावी, मृत व्यक्तीला सागुग्रह मदत देण्यात यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला कायम स्वरुपी नोकरी देण्यात यावी.
इत्यादी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने रुग्णालयातील परिचारिकांना सोबत घेऊन काल कामबंद आंदोलन केले. सदरहु आंदोलनात वंचीत बहुजन आघाडीचे महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे, महिला आघाडी शहर अध्यक्षा तनुजा रायपुरे, महासचिव मोनाली पाटील, निखिल रत्तेवार , हर्षवर्धन कोटारकर इंदू डोंगरे, चंद्रप्रभा रामटेके, ललिता दुर्गे, पौर्णिमा जूनघरे ,अविता उके , पुष्पलता कोटांगडे, रुपचंद निमगडे,व वंचितचे बहुसंख्य कार्यकर्तेगण सहभागी झाले होते. जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी या कडे तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी देखील आता होवू लागली आहे.