◽——— व्यथा ——◽
🌸कु.उज्वला वाल्मिक नगराळे सहज सुचलं सदस्य चंद्रपूर जि.चंद्रपूर ◽
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
माझ्या आसवांचा पूर दाटे पापणीच्या आत
आता सांगू मी कुणाला व्यथा दाटली उरात
रोज नव्या यातनांना अशी सामोरी जाते मी
श्वास घुटमळे श्वासात आणि नि:शब्द होते मी
वारा,वादळ,पाऊस नाही भिती उन्हाचीही
काय शिजवू सांजेला मला रोज काळजी ही
नाही डोईवर छत नाही पैसा नाही धन
महागाई वाढलेली घेते कवेत गगन
झाले शिक्षण खाजगी जणू भरला बाजार
कसे शिकवू मुलांना कसा सोसावा हा भार
कधी येतो महापूर कधी होते गारपीट
रोज पडती उपास आला जीवनाचा वीट
कसं व्हावं लेकराचं सदा चिंता ही छळते
मोबाईल हातामध्ये जरी वय नाकळते
असे विचार अनेक त्यांचा चौफेर तांडव
आसवांच्या पावसात ओला मनाचा मांडव
झरणाऱ्या आसवांना कुणी नाही पुसावया
गुन्हेगार मीच आता श्वास मोकळा करावया