Varora taluka @news
• खरिप हंगाम – २०२४ साठी बियाणे व खताची कमतरता भासणार नाही:कृषी अधिकारी जाधव / धात्रक
•बोगस बियाणे विक्री, साठेबाजी करण्यार्यांवर कृषी विभागाची कडी नजर
सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी,वरोरा
वरोरा : खरिप हंगाम २०२४-२५ ला सुरूवात झालेली असून भद्रावती तालुक्यात कंपनी निहाय कापूस बियाणे, सोयाबिन बियाणे, धान बियाणे, तुर बियाणे प्राप्त झालेले आहे. शेतकऱ्यांना बियाण्याची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांकडील बियाणे वापरण्याबाबत जनजागृती सुरू आहे. बोगस बियाणे विक्री, बियाणे /खते छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणार्यावर कृषि विभाग लक्ष ठेवून आहे. तक्रार मिळताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भद्रावती तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव व पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयंत धात्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रसिद्धीपत्रका नुसार कापूस बियाण्याच्या सर्वच कंपनीच्या सर्वच वाणाचे गुणधर्म जवळपास सारखेच असल्याने कोणत्याही एका वाणाची मागणी किंवा बाजारात कमतरता आढळून आल्यास इतर कंपनीच्या कापूस बियाण्याची खरेदी करून पेरणी करावी. रासायनिक खताचे बाबत तालुक्यात कंपनीनिहाय डी. ए.पी., युरिया, एस. एस. पी २०:२०:०:१३. १०:२६:२६ म्युरेट ऑफ पोटॅश व इतर सर्व खते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या आर्थिक वर्षात रासायनिक खताचे दर कंपनी निहाय वेगवेगळे आहेत. या संबधात काही अडचणी आल्यास लगेच नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधुन तशी लेखी स्वरूपात तक्रार नोंदवावी.
बियाणे / खते शेतकऱ्यांचे बांधावर देण्याकरिता कृषी विभागाने नियोजन केलेले असून, शेतकरी बचत गट, फार्मर प्रोड्यूसर कंपनी, ग्राम पंचायत यांनी सुध्दा या कामी पुढाकार घ्यावा व आपले गावातील शेतकऱ्यांना लागणारे बियाणे खते ची मागणी कृषी विभागाला द्यावी जेणेकरून सर्कल निहाय नजिकच्या कृषी केंद्र/सोसायटी मधुन शेतकऱ्यांचे बांधावर बियाणे / खते पुरवठा करणे सोईचे होईल. बियाणे / खते छापील किमतीपेक्षा जास्त दराने जर कोणी कृषी केंद्र धारक विक्री करीत असेल तर याबाबत शेतकरी बांधवांनी कृषी विभागास माहिती द्यावी. माहितीच्या आधारे शहानिशा करून सदर कृषी केंद्रावर नियमान्वये कडक कार्यवाही करण्यात येईल, असे कृषी अधिकारीद्वय जाधव व धात्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
