Home Breaking News #Chandrapur • रोजगार मेळावे – कौशल्य व संधी यांचा सेतू – आ....

#Chandrapur • रोजगार मेळावे – कौशल्य व संधी यांचा सेतू – आ. किशोर जोरगेवार • चंद्रपूरात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन !

174

#Chandrapur
• रोजगार मेळावे – कौशल्य व संधी यांचा सेतू – आ. किशोर जोरगेवार

• चंद्रपूरात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन !

चंद्रपूर :प्रियंका गायकवाड, प्रतिनीधी
आजचा पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून तरुणाईच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. तरुणांच्या मनात असलेली ऊर्जा आणि उद्योजकतेची वृत्ती योग्य दिशेने वळवली, तर आपण आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावू शकतो. कौशल्य विकास हाच भविष्यातील यशाचा मंत्र असून रोजगार मेळावे हे कौशल्य आणि संधीचा सेतू आहेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर, मॉडल करिअर सेंटर, चंद्रपूर आणि जनशिक्षण संस्थान-२, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरातील जनशिक्षण संस्था येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संजय पवार, जनशिक्षण संस्थानचे संचालक अमोल गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतूराज सुर्या, बँक ऑफ महाराष्ट्रचे एल.डी.एम. राजू नंदनवार, कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, सुभाष ढोंबरे, प्रशिक्षण केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरणे, रोषण गभाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, आजचा हा मेळावा आपल्या तरुण पिढीसाठी आशेचा किरण आहे. रोजगार मिळवण्याइतकेच रोजगार निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करावा. शासनाच्या विविध योजना आणि मार्गदर्शन केंद्रांचा लाभ घ्यावा. आज येथे अनेक प्रतिष्ठित नियोक्ते सहभागी झाले आहेत, ज्यांनी आपल्या तरुणांना संधी दिली आहे. या संधीचे सोने करा, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घ्या आणि कौशल्य आत्मसात करा असे आवाहन त्यांनी केले.
हा रोजगार मेळावा म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यासाठीचा मंच नाही, तर नव्या संधींचे दरवाजे खुलं करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आजच्या युगात शिक्षणासोबतच कौशल्यविकास आणि योग्य मार्गदर्शनाला विशेष महत्त्व आहे. केवळ पदवी मिळवून रोजगार मिळतोच असे नाही, तर योग्य कौशल्य असणाऱ्या युवकांना उद्योगजगतात मागणी आहे. आजचे उत्तम आयोजनामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळणार आहे, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला नियोक्ते, युवक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.