विसापूर येथे बुद्ध जयंतीनिमित्त अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रम
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर
बल्लारपूर : विसापूर येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल, युनिट विसापूरच्या वतीने १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बुद्धांच्या समतेच्या व करुणेच्या संदेशाचे स्मरण करत मानवतावादी विचारांची उजळणी केली.
समता सैनिक दल या वर्षी आपले १०० वे वर्ष साजरे करीत असल्याने या जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यानिमित्त सायंकाळी ७ वाजता विसापूर येथील समता सैनिक दलाच्या कार्यालयात प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. भास्कर कांबळे (राष्ट्रीय थिंक टँक, समता सैनिक दल) होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या जीवनकार्याचा व त्यांच्या तत्वज्ञानाचा सखोल आढावा घेतला. तसेच बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसंदर्भात त्यांनी उपस्थितांना विशेष प्रबोधन केले.
प्रमुख अतिथी म्हणून धनराज पुणेकर (जिल्हा संघटक, समता सैनिक दल) यांनी उपस्थितांना संबोधित करत बुद्ध जयंतीचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन समता दुर्गे यांनी केले. प्रस्ताविक संजना सोनारखंन यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन डॉ. अश्विनी कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमास स्थानिक नागरिक व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



