बल्लारपुरातील तरुणाची विसापुरात
निर्घृण हत्या
गुंडांच्या टोळीचा धुमाकूळाने नागरिकांत भीती : जुन्या वैमनस्यातून घटना घडल्याची शक्यता
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम(प्रतिनिधी बल्लारपूर)
विसापूर : बल्लारपूर येथील गुंडाच्या टोळीने पाठलाग करुन एका तरुणाची निर्घृण हत्या केली.गुंडांच्या टोळीच्या धुमाकूळाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बल्लारपुरातील तरुणाची विसापुरात निर्घृण हत्या केली. ही घटना विसापूर येथे शुक्रवार ( दि.१५ ) मे रोजी सांयकाळी ६ वाजता घडली. विराज आगधारी ( वय – १७ ) रा.किल्ला वॉर्ड, बल्लारपूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वैमनस्यातून सदर हत्या झालाच्या संशय व्यक्त केला जात आहे. हत्या करून आरोपी फरार झाले असून पोलीस आरोपींच्या मागावर आहे.
बल्लारपूर येथील गुंडाची टोळी दोन मोटार सायकल घेऊन सायंकाळच्या सुमारास विसापूर गावात आले.पाच ते सहा संख्येत असलेल्या टोळीने विराजचा तुकडोजी चौक येथून पाठलाग केला. पहिल्यांदा त्याचेवर गुंडाच्या टोळीने खंजर ने प्रहार केला. मात्र त्याने गुंडाच्या टोळीचा नेम चुकवला. त्याने जिवाच्या आकांताने पळ काढला. गुंडाच्या टोळीने पाठलाग करून विसापूर रेल्वे चौका जवळ असलेल्या अली शेख यांच्या घराच्या फाटकाजवळ विराजला गाठले. त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करुन जागीच ठार केले.या घटनेमुळे विसापूर येथे एकच खळबळ माजली असून ही वार्ता वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विपीन इंगळे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी आले.त्यांनी न्यायसहायक प्रयोगशाळेच्या चमुला पाचारण करून घटनेचा पंचनामा सुरु केला. भर रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. ही घटना जुन्या वैमनस्यातून घडली असावी,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विराज ची बहीण घटनास्थळी दाखल झाल्यावर एकच आक्रोश करुन अज्ञात मारेकऱ्यांचे नाव घेत होती. बल्लारपूर पोलीस घटनेचा पुढील तपास करत असून फरार आरोपींच्या मागावर आहे.



