Home कृषी प्रयोगशिल शेतीचे  सुखद चित्र; राज्यात हे गाव झाले फेमस

प्रयोगशिल शेतीचे  सुखद चित्र; राज्यात हे गाव झाले फेमस

216

शेततळ्यातून मत्स्योपादन : शेतकऱ्यांचे जीवन बनले सुकरल

शेगाव: प्रयोगशिल शेतीचे  सुखद चित्र येऊलखेड या गावात पाहायला मिळत आहे. शेततळ्यांमध्ये कथला व सायप्रनस जातीचे मत्स्यबीज टाकून शेतकरी मत्स्योत्पादन घेत आहेत. या माध्यमातून कुटुंबाचा गाडा ओढण्यासोबतच दोन पैसे मागे टाकण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांचे जीवन सुकर बनले आहे.

शेगाव तालुक्यातील येऊलखेड येथील शेतकऱ्यांच्या मेहनत आणि जिद्दीची कहाणी काही औरच आहे. कुठल्याही कामात झोकून दिले तर ते तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा स्वभावगुण शेतकऱ्यांचा झाला आहे. या जोरावरच गावातील प्रत्येक शेतकरी वेगळे काहीतरी करून दाखवून आर्थिक प्रगतीचा मार्ग साधत आहे. शशी पुंडकर, संतोष पुंडकर, सदानंद पुंडकर, माळी यांच्यासह दहा शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेततळे निर्माण केले. त्यात मत्स्यशेती सुरू करण्यात आली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत तळ्यामध्ये मत्स्यबीज टाकावे लागते. शक्यतोवर कथला व सायप्रनस जातीच्या मच्छीचे उत्पादन घेतल्या जाते. अंडी दिल्यानंतर आठ महिन्यांच्या कालावधीत मच्छीची १ किलो वाढ होते. आम्ही अर्धा किलो, पाव किलोने विक्री करतो. स्वत: विकले तर दीडशे रुपये आणि दुसऱ्याला दिल्यास शंभर रुपये किलोने मच्छी द्यावे लागते. साधारणत: पाच ते दहा क्विंटल मत्स्योत्पादन होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
खारपाणपट्ट्यात जलसमृद्धी

शेगाव तालुक्यातील काही भाग खारपाणपट्ट्यात येतो. याच पट्ट्यात येऊलखेड गाव येते. क्षारयुक्त पाण्यामुळे शेतीची पोत खराब होते. मात्र, जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांचे निर्माण केल्याने शिवार जलमय होण्यास मोठी मदत झाली. हे पाणी जास्त क्षारयुक्त नसल्याने शेती पिकांसाठी पोषक ठरले आहे. सगळीच शेतजमीन कोरडवाहू होती. ती आता पाणीदार झाली असून, ही जमीन बागायती शेतीलाही मागे टाकत आहे.

खरीप व रब्बी हंगामातील पारंपरिक पिके घेण्यासोबतच नवनवीन प्रयोग शेतकरी आहेत. त्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत ते घेत असलेल्या मेहनतीला तोड नाही. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने काम करत असल्याचे फळ आम्हाला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतात.