मलकापूर- कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून संचारबंदी व कोविड-१९ नियमांचे आदेश जारी केले आहेत. त्याच काळात शिवजयंती उत्सव येत असून तेव्हा कोविडचा प्रसार होवू नये तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शांततेत साजरी होण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे आयोजन समिती व नागरिकांनी पालन शांततेत साजरी करावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी केले.
१७ फेब्रुवारी रोजी स्थानिक शहर पोलिस स्टेशन येथे शिवजयंतीच्या अनुषंगाने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा पोलिस उपअधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलदार तडवी, तहसीलदार कु.स्वप्नाली डोईफोडे, ठाणेदार प्रल्हाद काटकर यासह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जि.पो.अधिक्षक अरविंद चावरीया, जि.पो.उपअधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, माजी आमदार वसंतराव शिंदे, नगरसेवक भाई अशांत वानखेडे यांनी यावेळी शहरातील कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावा त्याचप्रमाणे प्रशासनाने दिलेल्या संचारबंदी व कोविड- १९ चे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच शिवजयंती उत्सव समितीचे आयोजक शिवराज जाधव यांनी यावेळी सांगितले की, शिवजयंती उत्सव हा शासनाच्या नियमानुसारच साजरा करण्यात येणार असून शिवाजीनगर येथील भवानी माता मंदिरात शिवजन्मोत्सव सोहळा साध्या पध्दतीने साजरा करू, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची रॅली, मिरवणूक काढण्यात येणार नाही. तसेच झेंडे वाटपाचा कार्यक्रम सुध्दा स्थगित करण्यात आला असल्याचे शांतता समिती बैठकीत सांगितले.
याप्रसंगी शांतता कमिटी सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय सेवेतील विविध विभागाचे अधिकारी, नागरिक, पत्रकार उपस्थित होते.
