Home Breaking News घुग्घुस येथे पूर्व खरीप शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आधुनिक शेती तंत्रज्ञान,...

घुग्घुस येथे पूर्व खरीप शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन व पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

7

घुग्घुस येथे पूर्व खरीप शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन व पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

सुवर्ण भारत : पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, घुग्घुस यांच्या वतीने मुरसा येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १९ ते २२ मे दरम्यान “पूर्व खरीप शेतकरी मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या चार दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन १९ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, शासकीय योजना, महिला बचत गटांची भूमिका तसेच खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी गजानंद पवार, तालुका कृषी अधिकारी श्री. अनिकेत माने, जैन इरिगेशनचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पांगुल उपस्थित होते. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड वाय. जी. एस. प्रसाद यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल यांच्यासह फाउंडेशनचे कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज असल्याचे सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शंकर तोटावार यांनी सोयाबीन पिकातील उत्पादनवाढीसाठी अष्टसूत्री तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दर्जेदार बियाण्यांची निवड, माती परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर, कीड व रोग व्यवस्थापन तसेच पाण्याचे नियोजन या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेत उत्पादन खर्च कमी करून उत्पादनवाढ साध्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर भाष्य करताना कमी पावसाच्या परिस्थितीत योग्य पिकांची निवड, ठिबक व सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक शेती पद्धती आत्मसात करून शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर बनावे, असे त्यांनी नमूद केले.

उद्घाटक वाय. जी. एस. प्रसाद यांनी आपल्या मनोगतात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे ग्रामीण व शेतकरी विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कंपनी कटिबद्ध असून भविष्यातही अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांनी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादनक्षम शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

मेळाव्यादरम्यान पुढील तीन दिवस विविध विषयांवर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस पिकातील घन लागवड पद्धती, आंतरपीक लागवड, तूर लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक व तुषार सिंचन, पीक नियोजन व्यवस्थापन, जनावरांची काळजी, कृषी अवजारे तसेच बीज प्रक्रिया या विषयांचा समावेश आहे. यासोबतच जैन इरिगेशनच्या ठिबक सिंचन प्रणालीचे तसेच उपरे अ‍ॅग्रो इंटरप्रायझेस, चंद्रपूर यांच्या कृषी अवजारांचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आदित्य कदम यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. विद्या पाल यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांकडे वळण्याची गरज अधोरेखित केली.

मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आली तसेच शेतीविषयक माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.