विदर्भ डेस्क
नागपूर: कोरोना महामारीची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी नुकतच जनतेशी सवांद साधला नियम पाळले नाही तर लॉकडाऊन करू असा गर्भित इशारा त्यांनी दिला. सामान्य नागरिकांनी हा आदेश मानला मात्र विदर्भातील शिवसेनेचे आमदार व मंत्री यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश धुडकावून लावला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. सोबतच सभा, मोर्चे, राजकीय कार्यक्रम आयोजित करता येत नाही एवढेच नाही तर लग्न सोहळ्यात 25 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. मात्र हे सर्व नियम सामान्य जनतेला लागू आहेत, राजकीय लोकांना नाहीत असा प्रश्न पडू लागला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे आमदार व मंत्रीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश मानत नसल्याचे दिसून येत आहे.
कोण आहेत आमदार व मंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश न मानणारे त्यांच्याच पक्षाचे आमदार व मंत्री कोण हा प्रश्न तुम्ही पडला असेलच, तर एक आहेत बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड व दुसरे आहेत वनमंत्री संजय राठोड.
५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी मनाई केली असली तरी धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष कुणाल संजय गायकवाड यांनी त्यांच्या फेसबुकवरुन बुलडाणा येथील शिवस्मारक कार्यक्रम २२ फेब्रुवारी रोजी ठरलेल्या वेळी होणार असल्याची पोस्ट केली. ठरल्याप्रमाणे समितीचे कार्याध्यक्ष आ.संजय गायकवाड व उपाध्यक्ष राजेश हेलगे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार किरण सरनाईक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत व शिवजयंती समितीचे अध्यक्ष कुणाल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कोणत्याही आदेशाची पर्वा न करता, उत्साहात हा भूमिपुजन सोहळा पार पडला. यावेळी शिवरायांच्या मावळ्याने अखेर रयतेला दिलेला शब्द खरा करुन दाखविल्याच्या भावना उमटल्या. यावेळी अजय लाहोटी, उमेश शर्मा, भारत शेळके, अजय बिलारी, गजेंद्र दांदडे, श्रीकांत गायकवाड, मोहन पऱ्हाड, उमेश कापुरे, दिपक सोनोने, अशोक इंगळे, श्रीकृष्ण शिंदे, ओमसिंग राजपूत, नितीन राजपूत, रवी पाटील यांच्यासह बरेच लोक ( 5 पेक्षा 10 पट) उपस्थित होते. तरी सुद्धा जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली नाही.
दुसरा प्रकार मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येते घडला. राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे विदर्भातील एक नेते संजय राठोड यांच्यावर पुजा चव्हाण प्रकरणी गेली 15 दिवस जे आरोप होत आहेत, त्या संदर्भात स्वतःची भूमिका न मांडता आजवर गायब असणारे राठोड काल पोहरादेवी येथे प्रगट झाले. मात्र त्यावेळी त्यांनी आणि समर्थकांनी केलेले शक्ती प्रदर्शन लोकशाही व्यवस्थेची मान शरमेने झुकवणारे होते.
पुजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात अपघाती मृत्यू झाल्यावर ज्या पद्धतीने ना.संजय राठोड यांचे संभाषण आणि तिच्या सोबतची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत, त्यावरून या दोघांचा उत्तम परिचय असावा यात कुणाला शंका नाही. भाजपच्या महिला आघाडीने याप्रकरणी थेट संजय राठोड यांचे नाव घेवून पुजाच्या आत्महत्याप्रकरणी राठोड यांना अटक करण्याची मागणी केल्यावर राठोड यांनी माध्यमांपुढे येवून भूमिका स्पष्ट करून प्रश्नोत्तरांना सामोरे जाण्याची गरज होती. मात्र ते टाळून आज राठोड पोहरादेवीच्या धर्मपिठाला नतमस्तक झाले.
कोरोनाचा सर्वत्र उद्रेक सुरू असताना राठोड यांच्या समर्थकांनी जी गर्दी आणि शक्ती प्रदर्शन केले त्याचे कोणत्याच पातळीवर समर्थन होवू शकत नाही, या दोन्ही घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द रिपब्लिक महाराष्ट्रचा एकच प्रश्न आहे, नियम फक्त सामान्य जनतेला लागू आहेत का? या दोन्हीही घटना कारवाई साठी पात्र आहेत, कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र म्हणेल, उद्धवजी अजब तुमचं सरकार?
