▪️ जिल्ह्यात पावसाने तब्बल 5699 हेक्टर क्षेत्र पाण्यात
▪️ 118 गावातील 8300 शेतकरी बाधित
बुलडाणा ( साभार – प्रशांत खंडारे) : गेल्या तीन दिवसात म्हणजे सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. तब्बल 118 गावातील 8300 शेतकरी बाधित होऊन 5699 हेक्टर शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पदरमोड करून शेतामध्ये पीक उभे केले. पिकांना पाऊस आवश्यक असतांना मात्र पावसाने पाठ फिरवली होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असताना पावसाने रीपरीपायला सुरुवात केली.पिकांना संजीवनी देखील मिळाली. परंतु लहरी पाऊस कोसळत असताना त्याने तब्बल 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान थांबायचे नाव घेतले नाही. या तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील तब्बल 118 गावातील 8300 शेतकऱ्यांना आर्थिक तडाखा दिला. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावत असल्याचे शेतकऱ्यांनी डोळ्यादेखत बघितले. जिल्ह्यात सुमारे 5699 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक मोताळा तालुक्यातील 96 गावे बाधित झाली असून सोयाबीन,कापूस, मका,पिकांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ बुलडाणा तालुक्यातील 14 गावे बाधित झाली असून सोयाबीन, तूर, मका, उडीद व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच खामगाव तालुक्यातील 8 गावे बाधित झाल्याने कापूस, सोयाबीन, उडीद, मका पिकांची नासाडी झाली. शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांचा बांध फुटल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून चिंताक्रांत शेतकरी मदतीची आस लावून बसलेला आहे
