श्रीधर ढगे पाटील
मुंबई :राज्याच्या राजकारणात रोज नवीन नवीन काही घडत असून आता आणखी एक ट्विस्टस समोर आलेला आहे. माजी गृह मंत्री अनिल देशमुखांविरोधात अजून कोणतेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र परमबीर सिंह यांनी न्यायालयात सादर गेले असल्याने आता हे प्रकरण काय वळण घेते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रतिज्ञापत्रानं मोठी खळबळ उडवून दिली आहे.
एका आघाडीच्या मराठी वृत्त वाहिनीच्या बातमी नुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाणे न्यायालय आणि मुंबईतील किला कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून परमबीर सिंह गायब आहेत. मात्र, आता सिंह यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. आपल्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात अजून कोणतेही पुरावे नसल्याचं सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान परमविरसिंह यांना मुंबई पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली असून ते बेल्जियम मध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंह यांनी पतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्याची पुष्टी सिंह यांच्या वकिलांनी केलीय. मागील सुनावणीवेळी सिंह यांच्याकडून हे प्रतिज्ञापत्र चौकशी आयोगाकडे सादर केल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. आरोगाकडून सिंह यांच्याविरोधात अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, सिंह अद्याप एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. चौकशी आयोगाने सिंह यांच्यावर जूनमध्ये 5 हजार रुपये आणि दोन वेळा 25 हजार रुपये दंडही ठोठावला होता.
