Chandrapur @city news
दररोज होणाऱ्या वाघांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी जाणे दुर्भाग्यपूर्ण :- राजु झोडे
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कठोर उपायोजना करावी अन्यथा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा राजु झोडे यांची मागणी
सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर
चंद्रपुर:-चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, गोंडपिपरी, बल्लारपूर, राजुरा तालुक्यात दररोज वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात या मागील दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर राजुरा, बल्लारपूर तालुक्यातील जनावरांवर वाघाने हल्ला करून ठार केले. दररोज कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जिल्ह्यातील निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे तरी जिल्ह्यातील पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे
झोपेचे सोंग घेऊन आहेत आणि जिल्ह्यातील समस्या कडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केला.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल सात जणांचा वाघाने बळी घेतला तरीही वनमंत्री “वाघ वाचवा” चा नारा देत असून माणसाचा जीव कोण वाचवणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना वीस लाख रुपये निधी जाहीर केले परंतु माणसांची किंमत ही पैशाने मोजून मोकळे होता येणार नाही.
दररोज होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड दहशत असून जंगलालगतच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झालेले आहे. अशातच वन विभागाने कठोर निर्णय घेऊन वाघांचे होणारे हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच वनमंत्र्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन तात्काळ उपायोजना करावी. जर वन्य प्राण्यांचे होणारे हल्ले वनमंत्र्यांना थांबवता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ही राजू झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.