Home Breaking News Chandrapur dist@ news • शेतकऱ्यांनी घेतले शास्त्रोक्त बांबू लागवडीचे धडे बीआरटीसी आणि...

Chandrapur dist@ news • शेतकऱ्यांनी घेतले शास्त्रोक्त बांबू लागवडीचे धडे बीआरटीसी आणि आत्माचा संयुक्त उपक्रम

165

Chandrapur dist@ news
• शेतकऱ्यांनी घेतले शास्त्रोक्त बांबू लागवडीचे धडे
बीआरटीसी आणि आत्माचा संयुक्त उपक्रम

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली आणि आत्मा कार्यालय, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवशीय निवासी बांबू लागवड प्रशिक्षण कार्यशाळा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वन अकादमी,चंद्रपूर येथे संपन्न झाली. हिरवं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूच्या पर्यावरणीय महत्त्वा सोबतच सामाजिक, आर्थिक व औद्योगिक महत्त्व लक्षात घेऊन तसेच वनेतर क्षेत्रावर बांबूचे क्षेत्र जास्तीत जास्त वाढावे यासाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे या उद्देशाने आयोजित सदरहु कार्यशाळेचे उद्घाटन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांच्या हस्ते झाले.

या कार्यशाळेत शाश्वत विकासासाठी पर्यावरण पूरक बांबू शेती व मूल्य संवर्धनाच्या संधी, व्यापारी दृष्ट्या बांबू लागवडीमध्ये अन्नद्रव्यवस्थापन, बांबू रोपवाटिका व्यवस्थापन, आत्मा कार्यालयाच्या योजना व शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणे, बांबू लागवड प्रात्यक्षिके, बांबू बाजारपेठ व उद्योग, बांबू प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या योजना, बांबू विपणन व व्यवस्थापन आदी विषयावर कृषी वनशेती संशोधन प्रक्षेत्र नागपूर चे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय इलोरकर, डॉ. प्रशांत राऊत, डॉ. आरती देशमुख, बीआरटीसीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी जी.सी. मेश्राम, बांबू विकास मंडळाचे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी श्रीनिवास माडभुशी मंडळ कृषी अधिकारी गणेश मादेवार, बांबूटेक ग्रीन सर्विसेसचे संचालक अन्नपूर्णा धुर्वे, अनिल दहागावकर, वनपाल विलास कोसनकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान शेतकऱ्यांना चिचपल्ली स्थित बांबू सेटममध्ये बांबू लागवडीच्या प्रात्यक्षिकांसोबतच बांबूच्या विविध प्रजातींची ओळख करून देण्यात आली.

या कार्यशाळेत राज्यभरातून विविध जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले. बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वर्षभर अश्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी यांनी त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांनी केले आहे.