Chandrapur dist@ news
• चंद्रपूर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गटप्रवर्तक व आशा वर्कर कर्मचाऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा !
• दिवाळी अगोदर मागण्या पूर्ण करा अन्यथा ऐन दिवाळीत मंत्री,खासदार व आमदारांच्या घरांसमोर काळी दिवाळी साजरी करु:विनोद झोडगे
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपुर:महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटकच्या वतीने गट प्रवर्तक कर्मचारी यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाणे वेतनश्रेणी,वार्षिक वेतन वाढ,अनुभव बोनस तर आशा वर्करला किमान वेतन,दिवाळी भाऊबीज आणि ऑनलाईन कामावर बहिष्कार या मागणयांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आझाद बगीचा येथून दुपारी 1 वाजता केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करत ताटी वाटी वाजवून जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सोमवारला आक्रोश मोर्चा काढला .यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देऊन शासकीय जी.आर.निघाल्या शिवाय संप मागे नाही असा निर्णय घेत दिवाळी दिवशी आमदार,खासदार व मंत्री यांच्या घरांसमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समिती द्वारे दि.18 ऑक्टोंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे.आरोग्य मंत्री यांनी संघटने सोबत 1 नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन आशा वर्कर ला 7200 रू. गट प्रवर्तक यांना 10000 रू. व त्यांना कंत्राटी कर्मचारी दर्जा व दिवाळी बोनस 2000 रू.देण्याचे जाहीर केले परंतु शासकीय जी.आर.न काढता संप मागे घेण्यास कर्मचाऱ्यांनवर दबाव आणल्या जात आहे म्हणून आशा व गट प्रवर्तक आक्रमक भूमिका घेत आझाद बगीचा ते जिल्हाधिकारी कार्यालय वर ताटी वाटी वाजवून मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधून घेतले.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ. विनोद झोडगे कॉ.प्रकाश रेड्डी कॉ .रवींद्र उमाटे, कॉ.राजू गैनवार कॉ .प्रदीप चिताडे , कॉ .निकीता निर कॉ.फरजना शेख कॉ. ममता भिमटे कॉ .सुहासनी वाकडे , वर्षा घुमे,शालू लांडे,सविता गटलेवार ,यांनी केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसें दिवस ऑनलाईन व इतर विना मोबदला कामाचा दबाब वाढविण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे आयटकच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी विविध प्रमुख व स्थानिक मागण्या करण्यात आल्या.ज्यामधे गट प्रवर्तक कर्मचा-यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत.जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.तसेच कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्करला किमान वेतन ,दिवाळी भाऊबीज दहा हजार रु.लागू करण्यात यावी. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला व कर्तव्य सूचित नसलेले कामे सांगू नये.आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून , मार्च 2020 ते ऑक्टोंबर 2022 पर्यंत थकीत देण्यात येणारा दरमहा हजार रुपये त्वरित देण्यात यावा.आभा कार्ड,गोल्डन इत्यादी कार्ड काढण्याची शक्ती करण्यात येऊ नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.
सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्करला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा. शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये,विना मोबदला कामे सांगू नये,जुलै पासूनचे थकीत वाढीव मानधन त्वरित देण्यात यावे,संघटने सोबत दर तीन महिन्यांनी राज्य,जिल्हा व तालुका पातळीवर समस्या निवारण बैठक घेण्यात यावी.यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा भरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक उपस्थित होत्या.
