#Bhadravti “साहेब आमच्या गावची दारू बंद करा हो”…
सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील महिलांचा महात्मा गांधी तंटामुक्ती समीतीकडे तक्रार
सुवर्ण भारत : राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा, गावातील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात महात्मा गांधी तंटामुक्ती समितीकडे तक्रार दाखल केली , ‘साहेब, आमच्या गावची दारू बंद करा हो…’ असा आर्त हाक पोलिस प्रशासनापर्यंत पोहोचवीला आहे. गावातील अवैध दारू विक्रीने अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून, महिलांचे जीवन अंधकारमय झाले आहे. लहान मुलांवरही याचा वाईट परिणाम होत असल्याने गावगाडा विस्कळीत होत आहे.
गावात कोणताही अधिकृत परवाना नसतानाही सर्रास अवैध देशी दारू विक्री होत आहे. मात्र, पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा रोष करत महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट महात्मा गांधी तंटामुक्ती समिती तक्रार दिले. जर लवकरच या अवैध दारू विक्रीवर कारवाई झाली नाही, तर महिलांनी त्या दारू विक्रेत्याला आमच्या भाषेने उत्तर देऊ किंवा उपोषणाचा इशारा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गावात अवैध दारू विक्री वाढत चालली असून, स्थानिक गुन्हेगार बिनधास्तपणे हा व्यवसाय करत आहेत. पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई नसल्याने दारू विक्रेत्यांचे धाडस वाढले आहे. यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत धडक दिली. महिलांच्या संयमाचा बांध फुटल्याने अखेर महात्मा गांधी तंटामुक्ती समितीद्वारे अवैध दारू विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत अवैध दारू बंद नकेल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहील असा इशारा अवैध् दारु विक्रेत्याना देण्यात आला त्यांनी एकमुखाने ‘दारू विक्री बंद करा’ अशी जोरदार मागणी केली.
पोलिस प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा, लवकरच मोठे आंदोलन उभे राहील, असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. आता प्रशासन या महिलांच्या मागणीची दखल घेते की नाही, यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
