Home Breaking News भद्रावतीत अवैध रेती तस्करीला महसूल विभागांचा आशीर्वाद? “कुंपणच शेत खातंय” गौण...

भद्रावतीत अवैध रेती तस्करीला महसूल विभागांचा आशीर्वाद? “कुंपणच शेत खातंय” गौण खनिज पथक संशयाच्या भोवऱ्यात

45
Oplus_131072

• भद्रावतीत अवैध रेती तस्करीला महसूल विभागांचा आशीर्वाद?

• “कुंपणच शेत खातंय” गौण खनिज पथक संशयाच्या भोवऱ्यात

भद्रावती तालुका प्रतिनिधी / राजेश येसेकर

भद्रावती : तालुक्यात अवैध रेती तस्करीने पुन्हा डोके वर काढले असून, महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अवैध रेतीला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेले गौण खनिज पथकच संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

सदर मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास गौण खनिज पथक शासकीय वाहनाने मानोरा तांडा परिसरातील विटाभट्टीजवळ गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्यावरून येणारा अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर पकडण्यात आल्याचे सांगितले जाते. संबंधित वाहनचालकाकडे कोणताही वैध परवाना अथवा वाहतूक पास (TP) नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
नियमांनुसार वाहन तहसील कार्यालयात जमा करून पंचनामा व दंडात्मक कारवाई अपेक्षित असताना, घटनास्थळीच कथित पैशांची देवाण – घेवाण ’ झाल्यानंतर वाहन सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकारामुळे “कुंपणच शेत खात आहे” असल्याचे निदर्शनास येत असल्याचे नागरिकांत व्यक्त होत आहे.

यापूर्वी तहसीलदारांनी अनेक अवैध रेती तस्करांवर कारवाई करून महसूल वाढवला होता. मात्र अलीकडील घटनेमुळे महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणीय हानीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
कायद्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमांनुसार परवानगीशिवाय रेती उत्खनन व वाहतूक करणे हा दंडनीय गुन्हा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जर जाणूनबुजून दुर्लक्ष केले अथवा संगनमत केले असल्यास त्यांच्यावरही शिस्तभंग व फौजदारी कारवाई होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच तालुक्यातील अवैध रेती तस्करीला कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत महसूल विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.
या प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे अपेक्षित असून, अवैध रेती तस्करीवर कठोर आणि पारदर्शक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.