चंद्रपूर जिल्ह्यात खनिकर्म पथकाच्या धडाकेबाज कारवायां अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांत उडाली खळबळ!
चंद्रपूर: किरण घाटे
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उपसा आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात खनिकर्म विभागाने मोठी मोहीम उघडली आहे.
चंद्रपूरच्या नवीन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या विशेष आदेशान्वये जिल्हा खाणीकर्म अधिकारी वसीम सय्यद आणि भूविज्ञान शास्त्रज्ञ खेळचंद वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली खनिज निरीक्षक चिराग हिंगेकर, वाहन चालक मनोज जिवतोडे आणि शिपाई नागेश यादव यांच्या विशेष पथकाने जिल्ह्यात ठिकठिकाणी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. या धडक मोहिमेमुळे वाळू माफिया आणि अवैध गौण खनिज वाहतूकदारांचे अक्षरशः धाबे दणाणले असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सदरहु मोहिमेदरम्यान खनिकर्म पथकाने १४ मे ते १६ मे दरम्यान गडचांदूर, चिमूर, सिंदेवाही आणि मूल रोड परिसरात वेगवेगळ्या दिवशी रात्री व पहाटेच्या सुमारास नाकाबंदी करून अवैध वाहतूक पकडली. यामध्ये १४ मे रोजी गडचांदूर येथे ७ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. १५ मे रोजी मूल रोड परिसरात ८ ब्रास अवैध वाळू घेऊन जाणारे वाहन पकडण्यात आले. तसेच १६ मे रोजी चिमूर तालुक्यातील नेरी रोडवर एकूण २० ब्रास, मांडवेरी (सिंदेवाही) येथे १० ब्रास आणि खडसंगी येथे १५ ब्रास अशी एकूण ६० ब्रासपेक्षा जास्त बेकायदेशीर वाळू जप्त करण्यात आली. संबंधित वाहनांच्या चालकांकडे वाहतुकीचा कोणताही वैध परवाना न आढळल्याने खनिज संपत्तीसह सर्व वाहने जागेवरच जप्त करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक भूमिकेनंतर खनिकर्म विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी करणाऱ्या कोणत्याही अवैध वाहतूकदाराला सोडले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही ही धडक मोहीम अशीच सुरू राहणार असून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे खनिकर्म विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.





