ठाणे: कोणतीही पूर्व कल्पना नसलेल्या आणि केवळ मतदानासाठी आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी महिला सुषमा लोणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करीत शिवसेनेने त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान केले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने, या पदासाठी पुन्हा आरक्षण जाहीर झाले. तसेच या अध्यक्षपदासाठी बुधवारी (ता. 15) निवडणुका पार पडल्या. यावेळी ठाणे जिल्हा परिषदचे अध्यक्षपद मागास प्रवर्ग (ओबीसी) हे आरक्षण जाहीर झाले. यासाठी ठाणे जिल्ह्यातील सात ते आठ ओबीसी महिला सदस्यांनी आपली वर्णी या पदावर लगावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घालण्यास सुरुवात केली. मात्र, अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत कुणालाच काहीही माहिती नव्हती. त्यात बुधवारी (ता. 15) निवडणुकीचा दिवस उजाडला.
अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळ येत होती; तशी इच्छुकांमध्ये धाकधूक सुरु झाली. कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, केवळ पक्षश्रेष्ठींचा आदेशाने केवळ मतदानासाठी आलेल्या कल्याण खडवली गटाच्या सुषमा लोणे यांच्या नावाची अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी अर्ज भरला मात्र त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने त्यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान, या संदर्भात नवनिर्वाचित अध्यक्षांशी संपर्क साधला असता, आपण केवळ पक्षाच्या आदेशानुसार मतदानासाठी पती सागर लोणे यांच्यासोबत आले होते. मात्र, पक्षाने माझ्या नावाची घोषणा करून व सर्वसामान्य कुटुंबातील महिलेचा सन्मान केला आहे.
अध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल अशी कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. तसेच माझ्या घरातील काही मंडळी सकाळी शेतीच्या कामासाठी गेले होते. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होणे म्हणजे सन्मानाची बाब आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वामुळे एका समान्य कुटुंबातील महिलेले आज अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला अश्या भावना शिवसेना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
