Home Breaking News जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी खामगवात स्वत: रस्त्यावर येत कारवाई

जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी खामगवात स्वत: रस्त्यावर येत कारवाई

139

 

खामगाव :जिल्ह्यात कोविड आजारामुळे बाधीत रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. संचारबंदीचे आदेश पारीत होताच आज गुरुवारी दुपारी खामगाव येथे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: रस्त्यावर येत कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी ( 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची मनाई) असणार आहे. आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्‍थित राहता येणार आहे. या समारंभामध्ये सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आयोजक व मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, लॉन मालक यांचेवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे. जिल्ह्यामधील इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि. 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान आज जिल्हाधिकारी एस रामस्वामी यांनी खामगाव येथे स्वतः रस्त्यावर येत कारवाई केली तर विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक व आढावा घेतला.