Chandrapur city@ news
• मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी घडविण्या-या शिक्षण संस्था समाजासाठी आदर्श :आ. किशोर जोरगेवार
• गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ संपन्न!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:चंद्रपूर शहरातील बाबुपेठ व भिवापूर भागात कामगार वर्गांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे असलेल्या शिक्षण संस्थांवर मोठी जबाबदारी आहे. येथील सरस्वती विद्यालयाचा यंदाचा 10 वीचा निकाल 92 टक्के लागला. यातुन येथील शिक्षणाचा दर्जा वाढत असल्याचा आनंद आहे. मध्यमवर्गीय कुटुबांतील विद्यार्थी घडविण्या-या या शिक्षण संस्था समाजासाठी आदर्श आहे. असे प्रतिपादन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
विदर्भ ग्रामविकास शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्धारा संचालित सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले , विदर्भ ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, सचिव शोभा पोटदुखे, मुख्याध्यापिका स्मिता अनर्थ, सुरेंद्र अडबाले, डॉ. संजय घाटे, डॉ. मनिषा घाटे, अशोक दुर्गे, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक करण सिंह बैस आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, अनेक शिक्षण संस्था मागासवर्गीय भागात काम करत आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासह गणवेश, पुस्तके देण्याचे कामही या संस्थांच्या वतीने केल्या जात आहे. ही एक सेवा आहे. या शिक्षण संस्थांच्या शाळांमधुन आता गुणवंत विद्यार्थी घडत आहे. हे कौतुकास्पद आहे. अशा शिक्षण संस्थांना बळकट करण्याचे काम आपण करत आहोत. येथे आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले
शिक्षण क्षेत्रात भरिव काम करण्याचा आमचा मानस आहे. हे काम करत असतांना गरिब, गरजु विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही विविध उपक्रम सुरु केले आहे. मतदार संघात 11 अभ्यासिकांचे आपण निर्माण करत आहोत. या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांना नि:शुल्क अभ्यास करता येणार आहे. तर बाबुपेठ सारख्या भागात असलेल्या मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेसाठी आपण 1 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून ही शाळा मॉडेल स्कुल बनणार आहे. पुढे याच धर्तीवर मतदारसंघातील अनेक शाळांचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आपला संकल्प असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्गांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
