पुराच्या पाण्यामुळे ४ तास विद्यार्थ्यांची बस थांबली; प्रशासनाच्या तत्परतेने सुटका
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : वरोरा तालुक्यात आज दुपारनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे टेमुर्डा-शेगाव मार्गावरील नाल्याला अचानक पूर आला. या पूरामुळे येरखेडा, आबमक्ता, पारडी, साखरा, लोदीखेडा, वडगाव खेमजई येथून वरोरा येथे शाळा-कॉलेजसाठी आलेल्या सुमारे ६० ते ७० विद्यार्थ्यांची बस आसाळा आणि भटाळा गावाच्या मधोमध अडकली.
पूराच्या पाण्यामुळे नाल्यावरून वाहत असलेले पाणी अत्यंत वेगवान आणि धोकादायक असल्यामुळे बसचालकाने विद्यार्थ्यांना घेऊन पुढे जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सर्व मुले जवळच्याच आसाळा गावात थांबवण्यात आली. लहान शाळकरी मुले भुकेने व्याकूळ होऊ लागल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना जेवण दिले.
दरम्यान, चार तास उलटून गेल्यावरही स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती मिळालेली नव्हती, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली. मात्र, सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यावर प्रशासन हालचालीत आले.
त्यानंतर तलाठी रितेश आमटे, मंडळ अधिकारी अजय निखाडे, कोतवाल राजू चांदेकर, सवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर तसेच तहसीलदार योगेश कौटकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. नाल्याचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा केल्यानंतर विद्यार्थ्यांची मानवविकास मिशन बस सुरक्षितपणे गावाकडे रवाना करण्यात आली.
या वेळी गावकरी, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांबरोबरच प्रशासनाचे आभार मानले.

