#chandrapur

विदयार्थीनींनी जाणले दुग्धव्यवसाय व सेंद्रिय शेतीचे महत्व.
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
घुग्घूस : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घूस ता. जि. चंद्रपूर येथील विदयार्थीनींनी घुग्घूस येथील प्रगतीशिल शेतकरी व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतावर जावून पशुपालन व कुक्कुटपालन व विषमुक्त शेतातून उत्पन्न झालेला भाजीपाला, फळे व पिकांची सविस्तर माहिती जाणून आपल्या शंका कुशंकांचे निरस्तन केले.
सेंद्रिय शेतीतून फळे भाजीपाला व इतर उत्पादन करणारे येथील प्रगतीशिल शेतकरी श्री. प्रदिप जोगी यांच्या शेतावर इयत्ता ९वी च्या विदयार्थीनींनी विज्ञान शिक्षक सुनिल म्हस्के व सिमा दुर्गे या शिक्षकांसह प्राचार्या अनू चोथे यांच्या मार्गदर्शनात भेट दिली असता त्यांनी भाजीपाला, फळे, तूर व कापूस यासह कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, गांडूळ खत व पशुपालन यासह मिश्र पिक पध्दती व सिंचन पध्दतीची माहिती दिली. यावेळी विदयाथीनींनी देखील विविध प्रश्न विचारुन आपले समाधान व्यक्त केले.
यावेळी खंत व्यक्त करतांना प्रदिप जोगी म्हणाले की, शेतकरी म्हणजे भारताचा कणा मानला जातो. परंतु त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. तसेच वाढत्या प्रदुषणामुळे शेतीपिकावर अनिष्ठ परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


