आशीर्वाद मंगल कार्यालयात लग्नसमारंभात मारहाण
वरातींचा धुडघुस 4 लोकांचे विरोधात गुन्हा दाखल
वरोरा पोलिसांची कारवाई
वरोरा शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्नसमारंभ दरम्यान वरातींच्या उन्मदामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. फटाके फोडण्यावरून वरून वाद उफाळून आला. आणि त्याचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहिद इरफान रंगरेज (वय २०, रा. वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आशीर्वाद मंगल कार्यालय त्यांच्या वडिलांनी भाड्याने घेतले होते आणि तेथे कामकाजाची जबाबदारी शाहिद रंगरेज पाहत होते. १० एप्रिल रोजी रात्री लग्नसमारंभ सुरू असताना वरात्यानी शहरात ठिकठिकाणी रस्ता अडवून बेधुंद फटाकेबाजी करत नागरिकांना त्रास दिला. परिसरात रहिवासी इमारती असतानाही मंगल कार्यालयाजवळही अंधाधुंद फटाके फोडले जात होते.
दरम्यान, शाहिद रंगरेज यांनी ही अनियंत्रित फटाकेबाजी थांबवण्याचा प्रयत्न करत वरात्याना समज देताच वातावरण चिघळले. तक्रारीनुसार, संतप्त झालेल्या सुमारे २० ते २५ बारात्यांनी अचानक शाहिद रंगरेज यांना घेरून लाथाबुक्क्यांनी, तसेच दगडांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या इतरांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. रस्त्यावर त्यांची वर्तणूकही अत्यंत संशयास्पद आणि असामान्य दिसत होती. काहींची देहबोलीच आक्रमक व गुन्हेगारी प्रवृत्तीची भासत होती, असेही नागरिकांनी सांगितले.
फिर्यादीने काही आरोपींची नावेही पोलिसांना दिली असून त्यामध्ये जामेश अब्दुल हारून शेख (रा. चंद्रपूर), शेख रहमत शेख अहमद (रा. बल्लारशा) आणि शेख काशिफ शेख साजिद (रा. अमरावती) यांचा समावेश आहे. इतर आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







