Home Breaking News जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

82

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेतील काही बाबी वगळता इतर अत्यावश्यक दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली आस्थापना / दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुध विक्री व वितरण केंद्र सकाळी 6 ते सकाळी 11 व सायं 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. कृषी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना या सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातंर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा व नगर पालिका, महावितरण ही कार्यालये 24 तास सुरू राहतील.
जिल्हयातील इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये हे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. पेट्रोल पंप हे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. हायवेवरील व शहर / गावाबाहेरील पेट्रोल पंप 24 तास सुरू राहतील. खाजगी वाहतुक अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. तथापी संबंधीतांना सोबत आवश्यक कागदपत्रे बाळगणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतुक नियमितरित्या सुरू राहील. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये केवळ रूग्णालये, मेडीकल, किराणा दुकान, भाजीपाला, फळ दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे दुकान, सुरू राहतील व इतर सर्व सेवा बंद राहतील. प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील सर्व वैद्यकीय सेवा व त्यासंबंधीच्या इतर सेवा 24 तास सुरू राहतील.
सदर आदेश 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताच्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे.
०००००००