शेगाव : देशभरातून श्री संत गजानन महाराजांचे दर्शनासाठी संतनगरी शेगावात येणाऱ्या भाविकांची गेल्या काही दिवसांपासून दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यामुळे भक्तांच्या वाहनांची संख्याही वाढली आहे.शहरात मंदिर परिसरामध्ये अधिकृत एकही वाहनतळ पार्किंग नाही तर या परिसरात असलेल्या काही खाजगी पार्किंग अपुऱ्या व लहान आहेत.त्यामुळे नाईलाजाने भक्तांना या परिसरामध्ये रस्त्यावर तसेच रस्त्यालगत आपापली वाहने उभी करावी लागतात. परिणामी या रस्त्यावर ट्राफिक जाम होऊन रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.या कारणावरून अनेकदा भाविक भक्त,रहिवाशी नागरिक व वाहनधारक यांच्यात वादाच्या घटना सुद्धा घडत आहेत.
भक्तांची लूट थांबवा!
शासनाने शेगाव तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत गांधी चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत असलेल्या खळवाडी परिसरात वाहन पार्किंग प्लाझा मंजूर केलेला असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन अकोट रोड लगत सुरभी कॉलनी समोर केले .मात्र अजूनही खळवाडीची जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आलेलीं नाही. मंदिर जवळील मातंगपुरीची जागा येथील रहिवाशांचे पुनर्वसन झाल्यापासून तशीच पडून आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.त्यामुळे काही लोक मंदिर जवळच्या या जागेत अनधिकृतपणे वाहन तळाचे नावावर भक्तांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळून त्यांची आर्थिक लुट करत आहेत.नगर पालिका प्रशासनाने मंदिराजवळ वाहन तळ निर्माण करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.कारण भक्तांना वाहने उभी करायला मंदिराजवळ एकही अधिकृत पार्किंग नाही. त्याची ईच्छा नसतांना त्यांना वाहने उभी रस्त्यावर वाहने लावावी लागतात.भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.भक्तासाठी प्रशासनाने शहरात सर्व सोयी सुविधा करणे आवश्यक आहे.मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

रस्त्यालगत व्यवसायिकांचे अतिक्रमण ; भक्त त्रस्त
श्रीं चे मंदिरकडे जाणारा रस्ता आधीच अरुंद आहे.त्यात या रस्त्यांवर अनेक व्यवसायिकांनी दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे.यामुळे वाहनधारक तसेच रहिवाशी नागरिक व दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांना मंदिरात पायी चालत जाणेही गर्दीमुळे कठीण होत आहे. गर्दीत महिलांच्या छेडखानीचे प्रकारही घडत आहेत.अतिक्रमणधारक व्यवसायिकांनी मंदिराला अक्षरशः वेढले आहे.श्रीं चे मंदिरासह प्राचीन महादेव मंदिर,माळीपूरा,चारमोरी परिसर कडे जाण्यासाठी सद्यस्थितीत लहुजी वस्ताद चौकातून जाणारा हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे सकाळपासून दिवस रात्र या रस्त्यावर मोठी वर्दळ असते.यामुळे मंदिरासमोर वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. भक्तांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.इतकी मोठी समस्या असतानाही याकडे पोलीसांचे दुर्लक्ष आहे.याठिकाणी पोलिसांची कायमस्वरूपी ड्युटी किंवा बंदोबस्त लावलेला दिसत नाही.किंवा नगर पालिका प्रशासनाने इतक्यात मोहीम राबवून मंदिर कडे जाणाऱ्या या रस्त्यालगतचे अतिक्रमण काढलेले नाही. मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी तातडीने या परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवून हा रस्ता रहदारीसाठी अतिक्रमण मुक्त करावा
अशी मागणी दर्शनार्थी भक्तांसह या भागातील रहिवासी नागरिकांची आहे.

सुरक्षेसाठी तैनात पोलीस कोठे आहेत?
रविवारी मंदीर परिसरात गर्दी होऊन भाविकांना मारहाण झाल्याची घटना, किरकोळ वाद झाले. मात्र परिसरात तैनात पोलिस कोठेही दिसून आले नाही. मंदिर परिसरात सुरक्षा रहावी या करिता १०० च्या वर पोलिस तैनात ठेवण्याचे आदेश होते. प्रत्यक्ष मात्र तसे दिसत नाही. परिसरात रूम एजंट, काही अन्य टवाळखोर दादागिरी करताना दिसतात. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच मंदिर परिसरात मुख्य द्वार, भक्त निवास क्रमांक 5 समोर, गांधी चौक, पश्चिम गेट व अन्य गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी फिक्स पॉईंट नेमून बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे.
चोरीचे प्रकारही वाढले..
मंदिर परिसरामध्ये वाहन पार्किंग नसल्यामुळे भाविक भक्तांच्या मोटरसायकली तसेच चार चाकी वाहने रस्त्यालगत उभी करण्यात येत आहेत.ही वाहने भक्त दर्शन करून मंदिरातून बाहेर येई पर्यंत बेवारस राहतात परिणामी काही अज्ञात चोरटे ही संधी हेरून भक्तांच्या मोटरसायकली लंपास करत असल्याचा घटना उघडकीस आलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात अधिकृत वाहनतळ असल्यास वाहन चोरीचे प्रकाराला आळा बसण्यास मदत होईल.
